देशावर अद्यापही..
ब्रिटिशांचा प्रभाव कायम आहे..
काल संध्याकाळपासून, पोलिसांसह मंत्र्यांपासून साऱ्यांचीच ट्रॅफिक अडवले म्हणून फर्ड्या ब्रिटिश इंग्रजीत (चंपा) षष्ठी काढणाऱ्या मुंबईच्या एका मर्सिडीजवाल्या भारतीय हाय फाय महिलेचा अफाट जोश प्रचंड चर्चेत आहे..
सोशल मीडियावर चोवीस तासांच्या आतच ती मॉडर्न कपड्यांमध्ये असलेल्या, डोक्यावर कॅप असणारी महिला तिच्या टोकाच्या आक्रमकतेने भलतीच ट्रेंडिंगमध्ये आहे..
दृश्य एकच आहे..पण प्रत्येकाने त्यामध्ये आपापल्या दृष्टिकोनातून काहीना काही शोधले आहे.!
काव्यागत न्याय म्हणजे, ज्या महिला विधेयकासाठी भाजपाच्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते, मंत्री, आमच्या खानदेशातले गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोर्चा काढला गेला.. त्यावर एका महिलेने गोंधळ करून बोळा फिरवला.. म्हणजे मोर्चाची उत्तम प्रसिद्धी होण्याऐवजी आणि उत्तम संदेश राज्यातल्या महिलांना जाण्याऐवजी त्या फाड फाड इंग्रजी महिलेलाच प्रसिद्धी मिळाली.!
मिळालेल्या (विविध) माहितीनुसार, त्या महिलेला मुलाला शोधायचे होते किंवा शाळेतून आणायचे वगैरे होते..
ट्रॅफिक जाममुळे तिच्यातल्या आईला काळजी वाटत असावी..
आणि एक चिडलेली आई जास्त खतरनाक असू शकते.!
भाजपाचे आंदोलन वरळीच्या रस्त्यावर असल्यानं ट्रॅफिक जाम झाले..आणि ही रणरागिणी पेट्रोल टाकल्यावर वस्तू पेटावी तशी भककन पेटली..
तिने तावातावाने गर्दीत घुसून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
एवढंच नव्हे तर..तेथून निघताना गेट आऊट फ्रॉम हिअर..( म्हणजे रस्त्यातून त्वरीत बाजूला व्हा.) असा आदेश देऊन मागे फिरली. आमच्या गिरीशभाऊंनी तिला समजविण्याचा थोडाफार प्रयत्न केला. ( हातवारे करून..) पण व्यर्थ.. शेवटी गिरीशभाऊंनी पोलिसांना हाताने तिला बाहेर काढण्याची सूचना केली..
पण कसचे काय..ही अंग्रेजी भारतीय वाघीण पोलिसांवर सुद्धा व्हसकन ओरडली.!
अर्थात हे सारं मोबाईल किंवा वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झाल्याने अगा असे काहीच घडले नाही असे सांगायची सुद्धा सोय राहिलेली नाही.!
मुंबईतील जनता पुण्यातील जनतेसाठी सोशिक नाही. ट्रॅफिक जाममुळे आधीच मुंबईकरांच्या सहनशीलतेच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत.!
यावर कुणी तरी.. हंडी फोडायची गरज होती..ती या बिनधास्त बाईंनी गाजावाजा करून फोडली एव्हढेच.! आता कुणाला चर्चेची आव्हाने देणार आम्ही..आणि त्याचा काय उपयोग..असो.!
त्या अँग्री यंग वुमेन महिलेने जवळच्या मैदानात आंदोलन करा..अशी सकारात्मक सूचना केल्याचे कुठेतरी वाचले आहे..
तिचा वाहतूकीचा खोळंबा करण्याला आक्षेप होता..मोर्चा किंवा आंदोलनाला नव्हता.!
पण कालच्या या भन्नाट प्रसंगामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित राहिले आहेत.!
एक उद्धटपणाकडे झुकलेली स्त्री पक्षाच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या अंगावर जाते, त्यांना गेट आऊट म्हणजे..आणि तेथल्या कार्यकर्त्या महिला काय करत होत्या.!
सुरक्षा रक्षक काय करत होते.!
बारकाईने त्या व्हिडीओकडे पाहिल्यावर दिसले की, एव्हढं सारं घडत असताना,
काही सेलिब्रिटी पदाधिकारी महिला इकडे तिकडे पाहत होत्या.. जणू याच्याशी आमचा काही संबंधच नाही.!
तिला अजिबातच जेरबंद करण्याचा प्रयत्न न होण्यामागे करणे काय असावीत..
तिचे फाड फाड इंग्रजी..?
उच्च शिक्षितांचा, उच्चभ्रूंचा पक्ष अशी ख्याती असलेल्या पक्षाच्या छोट्या मोठ्या कोणत्याही नेत्याला इंग्रजीत उत्तर देता येत नसावे का..
तिच्या एकूणच आक्रमक आवेशाने सगळे गर्भगळीत झाले असावेत का..
का.. तिचा भर वाहत्या वाहतुकीचा रस्ता अडविण्याबद्दलचा मुद्दा अगदीच पटल्याने अपराधीपणाची भावना असावी का..
त्याहीपेक्षा..आंदोलन महिला बिल पास न केल्याबद्दल असल्याने एका ( उद्धट का असेना..) महिलेला विरोध केला तर जग काय म्हणेल असा होता..
कालच्या मोर्चामुळे झालेल्या वाहतूक कोंडीपेक्षा भाजपची झालेली कोंडी पाहून जरा वाईट वाटले.. असो.!
मात्र अनेकांनी सोशोवर..काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत..त्यामध्ये तार्किकदृष्ट्या सकृतदर्शनी तथ्य वाटते..
सदर आक्रमक महिला..श्रीमंत हाय फाय इंग्रजी बोलणारी असल्यानं, तिची अरेरावी खपून गेली असावी का..
या महिलेच्या जागी एखाद्या मराठी महिलेने मराठीत सभ्यपणे हाच जाब विचारला असता तर..भाजपाच्या उत्साही आंदोलनकर्त्यांनी, पोलिसांनी तिला असे सोडले असते का.!
याबाबत सोशोवर लिहित्या, महिलांची बाजू समर्थपणे मांडणाऱ्या पुण्याच्या प्रसिद्ध कायदेतज्ञ ऍड परिक्रमा यांची पोस्टसुद्धा विचार करायला लावणारी आहे..
त्या श्रीमंत, मर्सिडीज
मालकिणीच्या जागी एखाद्या गोरगरीब मध्यमवर्गीय स्त्री किंवा पुरुषाने ट्रॅफिक अडवल्याबद्दल आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना किंवा मंत्र्याला जाब विचारला असता तर.. एक तर ती किंवा तो हॉस्पिटलमध्ये किंवा जेलमध्ये दिसले नसता का.!
अर्थात काहींना त्या बाईंची रस्त्यावरची आक्रमकता ही प्रस्थापितांच्या विरोधातल्या अन्याय वागण्या विरोधातली पेटलेली पहिली मशाल दिसली..वाटली.!
शेवटचा प्रश्न..भाजपाचा जनमानसावरचा प्रभाव हळूहळू ओसरतो आहे का.!
वुमेन्स अमेंडमेंट बिल हा संवेदनशील विषय आहे..या महिन्यात यावर साधक बाधक चर्चा सर्वत्र होत आहे..
डीलीमीटेशन म्हणजेच, लोकसभेच्या जागा वाढण्याच्या बिलाला तो जोडला गेला नसता तर कदाचित चित्र वेगळे दिसू शकले असते.
असेही भाजपच्या छुप्या अजेंड्यांबद्दल त्यांचे कट्टर विरोधक नेहमी कडवटपणे बोलत असतात..असो.
भाजपच्या कालच्या आंदोलनांची अवस्था करायला गेलो एक..या नाटकाच्या शीर्षकासारखी झाली असावी का..
आमचे मिश्किल लेखक मित्र.. सॅबी परेरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, एकीकडे देशाचे पंतप्रधान ॲम्ब्युलन्सला जायला भलामोठा रस्ता करून देत असतांना, दुसरीकडे त्यांचेच लोक जनतेचा रस्ता अडवून खोळंबा का करताहेत असा मार्मिक प्रश्न त्यांच्या मिश्किल शैलीत विचारत आहेत.!
इस बात में तो दम है.!