Saturday, February 26, 2022



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची एक सभा सुरु होती तिथे गाडगे महाराज पोहचले…
अचानक गाडगे बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले वर केलेल्या दोन्ही हातात हार घेऊन व्यासपीठा समोर उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब म्हणाले.... "बाबा तुम्ही खाली का उभे? वर या ना."
गाडगे बाबा म्हणाले "नाही बाबासाहेब तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या." हे ऐकून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले "बाबा, तुम्ही अगोदर वर या मग मी हार घेईन" ह्याच्यावरती गाडगेबाबांचे उत्तर होते "नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या." बराच वेळ ते दोन महापुरूष एकमेकांना विनंत्या करीत होते.
बाबासाहेबांच्या भाषणाची तार तुटली होती. वेळ होत होता म्हणून बाबासाहेब जरा रागातच म्हणाले. "बाबा तुम्ही, स्टेजवर का येत नाही..? त्यावर ते संतशिरोमणी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र आवाजात बोलले." बाबासाहेब तुम्ही ज्या स्टेजवर उभे आहात, त्या स्टेजला पाय लावायची माझी तरी लायकी नाही.'' गाडगेबाबांच्या तोंडून असे बोल बाहेर पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली आणि दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.
"आता तुमचे चालू द्या." असे बोलून क्षणांत गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात एका निष्कलंकित चारिञ्याने दुसऱ्या निष्कलंकित चारिञ्याची केलेली कदर... गाडगे महाराजांचा निरोप घेऊन बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य... स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या. सर्व नेते व कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पसंत केले. बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. जेव्हा गाडगेबाबांचे कीर्तन चालू असायचे. तेव्हा बाबासाहेब तिथे गेल्यावर खालीच बसायचे.
लोक त्यांना म्हणायचे की बाबासाहेब आपण वर बसा. पण बाबासाहेब मात्र, खालीच बसायचे. ‘जेथे संत गाडगेबाबा असतील तेथे घाण असूच शकत नाही. ''स्वतःच्या मुलाच्या मृत्यूने गाडगेबाबांवर कुठलाही परिणाम झाला नाही. परंतु बाबासाहेबांचा मृत्यू झाला हे समजल्यावर अवघ्या 14 दिवसात प्राण सोडणारे संत गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे असतील? याची जाणीव यातून होते.
संत गाडगे महाराज म्हणजे चालते बोलते विद्यापीठ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण संस्थेला गाडगे महाराजांनी पंढरपूर येथील धर्मशाळा उपलब्ध करुन दिली होती. स्वत: एकही दिवस शाळेत न जाणाऱ्या संत गाडगे महाराजांना शिक्षणाचे महत्व समजले होते. आजही गाडगे महाराजांचे विचार आपल्या पिढीला प्रेरक ठरणारे आहेत.
- #अमर_रामचंद्र_गोडसे

No comments:

Post a Comment